प्रसाद मंडप

आनंदसागर इमारतीमागे पहिला प्रसादमंडप व पुढील योजना लक्षात घेऊन आत्ताचे भव्य स्वयंपाकघर बांधण्यात आले. मग दुसरा, नंतर तिसरा असे पुढील पाच वर्षात प्रसादमंडप झाले. प्रसादभोजनाची गर्दी दररोजच्या ४००-५०० वरून २०००-२५०० वर गेली. दर पौर्णिमेला तर २० ते ४० हजार पान होते. सोय व्हावी, स्वच्छता रहावी व वेळ वाचावा यासाठी सेवेकरी रांगेतून येणाऱ्या भक्तांना ताटे वाढून देतात तसेच भक्तांना बसण्यासाठी टेबल - बाकांची सोय केली आहे, त्यामुळे वृद्ध व अपंग व्यक्तीही विनाकष्ट प्रसाद घेऊ शकतात. श्रींचे मूळ तत्त्व ‘अन्नदान’ हे अबाधित ठेवून हा काळानुरूप बदल अपरिहार्य होता. पूर्वीचाच वेळेचा वक्तशीरपणा व विशेष म्हणजे प्रसाद ग्रहण करणारे भक्त व वाढणारे सेवेकरी दोघांच्या सोयीचा म्हणून हा बदल सर्वांच्या पसंतीला उतरला आहे. आता एकाच वेळी ३००० पानांसाठी भाजी, आमटी, शिरा शिजेल एवढी भली मोठी १२-१५ पातेली आणली गेली. तेवढ्या मोठ्या तितक्याच चुली बांधल्या गेल्या. भक्तांसाठी ३०० किलो भात अर्ध्या तासात शिजेल असे ५ वाफेवरचे कुकर्स व त्यासाठी २ बॉयलर्स आता आहेत. सगळेच अवाढव्य झाले पण प्रसादाची चव तीच आहे कारण श्रीगुरूंची त्यावर अमृतदृष्टी आहे.