महाराष्ट्रात गोकुळाष्टमीला फार महत्त्व आहे. नुसतं कृष्णजन्म म्हणून नव्हे तर आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराज गोकुळाष्टमीला रात्री १२ वाजता जन्माला आले.
माणूस दोन तऱ्हेने जन्माला येतो
१. वासनेच्या संगे जन्म घेवो लागे. जसे तुम्ही, आम्ही! वासना जबरदस्तीने ढकलते आईच्या पोटात! चोर जसा घरात शिरतो तसे सामान्य लोक या जगात येतात.
२. खरे साधक वा इतर मोठे संत आपणहून जन्म घेतात, हव्या त्या ठिकाणी!
आमच्या मनात काय आहे हे तुम्हाला कळतं का? असे एकदा विचारल्यावर महाराज म्हणाले,” तुम्हाला कळत नाही इतकं तुमच्या मनातलं कळतं.” हा अंतार्यामीपणा! आणि म्हणूनच तो (सद्गुरु) तुमच्या वासनेत बदल करू शकतो. ही भगवंताची वासना निर्माण करणं हीच त्याची खरी कृपा आहे. अंतकाळी देह सोडायला नको वाटतं. देह सोडणं फार कष्टदायक आहे. दुसरी गोष्ट अंतकाळी कल्पना नाही अशी वासना उत्पन्न होते, कारण कुठेतरी गुंतलेलं असतं ते वर येतं. अंतकाळी तो (जीव) लाचार होतो असे महाराज म्हणत कारण तो काही करू शकत नाही. शांतपणे देह सोडणं याचं नाव परमार्थ! तुकामाईंची योग्यता मोठ्मोठयांना कळली नाही. मी नुसतं ‘शरण आहे’ इतकं म्हटलं की ते ‘आपला’ म्हणून उद्धार करीत. हा त्यांचा अधिकारविशेष होता. अंतकाळी अनेकांना त्यांनी आधार दिला व ते आल्याशिवाय राहिले नाहीत. महाराजांचंही असंच होतं. ते म्हणत, ‘जन्मभर काय सांगितलं ते आठवणारही नाही पण अंतकाळी आठवेल की, ‘त्यांनी सांगितलेलं मी केलं नाही’ तरी त्याचं काम होईल.’ कोट्यानुकोटी उद्धरिलें लोक! आपली वासना, अंतकाळ आला, की सूक्ष्म देहाला त्याचं कवच तयार होतं. त्या कवचासकटच तो देह सुटल्यावर राहतो. पुन्हा जन्म घेताना ते कवच प्रधानपणे घेऊनच येतो. त्यात भगवंताची वासना इतर वासनांबरोबरच कुठेतरी असतेच म्हणूनच इथे येतो. ‘माणूस आला की त्याच्यातला भगवंताच्या प्रेमाचा कणच मी बघतो बाकी तो दगडच असतो’ असे महाराज म्हणत. देव हवा असं वाटतंय ना? वा काही कारणाने नाम घेतोय ना? मग ते जवळ करतातच त्याला! सामान्य लोक वासनाधीन असतात. संत फक्त आपणहून जन्म घेतात. ज्याची त्यांनी अनेक जन्म उपासना केली त्याच्याशी तद्रूप होऊन गेल्यानेच त्या दिवशी जन्म झाला ज्ञानेश्वर महाराजांचा! तसंच समर्थांच रामाविषयी झालं! ‘ज्ञानेश्वर महाराजानी जिवंत समाधि घेतली तेव्हा ते कसे गेले असतील आतमध्ये?’ असं विचारल्यावर महाराज म्हणाले, ‘ते समाधीतून कधी खाली उतरलेच नाहीत!’ सत्पुरुषच सत्पुरुषाच्या खुणा सांगू शकेल. म्हणूनच निवृत्तीनाथांच्या डोळ्याला पाणी आले. महाराज म्हणत, ‘एक माणूस सोवळ्यात होता, त्याला एक निरोप एकाला सांगायचा होता तो त्याने मुलाबरोबर पाठविला, थोड्या वेळाने त्याला वाटले निरोप बरोबर पोहोचविला असेल की नाही म्हणून कपडे बदलून स्वतः निरोप द्यायला गेला. तसेच भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली, ती व्यासांनी बरोबर सांगितली की नाही असे वाटून स्वतः भगवंत ज्ञानेश्वर महाराज म्हणून आले ! गीतेचे रहस्य सांगावे ज्ञानेश्वर महाराजांनीच!’
आता श्रीकृष्णाचं पाहू! अहो बायको चोरीला गेली म्हणून राम रडत बसला. गंमतीने म्हणतो, - कृष्णालाही आवडेल हे- समजा कृष्णाची बायको रावणाने पळवली असती तर त्याने काय केलं असतं? त्याने नाना खटपटी लटपटी करून बायको परत मिळवली असती, न रडता! बरं इतकंच करून न थांबता त्याने रावणाची बायको पळवली असती! महाराज रामभक्त खरे पण त्यांचं वागणं कृष्णासारखं होतं. म्हणूनच समाधीवर कृष्णमंदिर बांधलय; ब्रह्मानंदांचं हे म्हणणं होतं. अहो महाराजांनी ‘धाबळी फेड’ सांगणं रामासारखं होतं का? आपल्याच शिष्याला हे नाटक करायला सांगणं हे रामाचं काम होईल का? हे कृष्णाचंच काम! एकदा महाराजांचं निरासक्तीवर निरूपण झालं तेव्हा भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणाले, ‘मला साधलय’ माझ्याकडची कोणतीही वस्तू घेऊन टाका” तेव्हा महाराज म्हणाले, ‘भाऊसाहेब ते सोपं नसतं एव्हढं, त्यासाठी साधनचतुष्टय संपन्न होऊन सर्व विकार जावे लागतात’ तरी तो ऐकेना मग ‘बरं’ म्हणून थांबले.
मग पुढे हरभटाला निवडलं व पढविल्याप्रमाणे तो भाऊसाहेबांना शिव्या देऊ लागला. शेवटी आईवरून शिवी देताच ते रुळ घेऊन धावत सुटले मारायला. आता हे सगळं लचाण्ड घेऊन तो पोहोचला महाराजांकडे! महाराज म्हणाले, भाऊसाहेब, तुम्ही तर क्रोध जिंकलाय ना ते कसे! त्यावर ते खजील झाले. आता हे रामायण का महाभारत?
श्रीकृष्ण व्यवहारचतुर होता. गांधारी दुर्योधनाला म्हणाली नग्न होऊन माझ्याकडे ये, माझ्या दृष्टीक्षेपानेे तू वज्रदेही होशील. तो निघाल्यावर श्रीकृष्ण म्हणाला अरे कमरेला तरी वस्त्र घे! तर श्रीकृष्णाकडे अशी लबाडी पदोपदी होती. तीच महाराजांकडे होती. कोणत्याही परिस्थितीत, विनोदबुद्धीने, प्रापंचिकाच्या गळ्यात परमार्थ उतरवावा तर त्यांनीच!
- पू. बाबा बेलसरे यांचे दि २२-८-१९९० रोजी झालेल्या निरूपणातील काही भाग