३० मार्च

ज्या घरात शांति । त्या घरात भगवंताची वस्ती ॥

 

 गृहस्थाश्रमासारखा आश्रम । दुसरा नाही खास ॥ नीतिधर्माचे रक्षण । यासाठीच विवाहाचे कारण ॥ ज्या घरात राहते शांति । त्या घरात भगवंताची वस्ती ॥ कृतीवर मनुष्याची परीक्षा । जैसी वासावर पदार्थाची परीक्षा ॥ कोणाचा न करावा घात । ऐसे वागावे जगात । आपले आपण करून घ्यावे हित । त्यालाच म्हणतात संभावित ॥ न कधी व्हावे आपण निराश । व्यवहार हात देईल खास ॥ व्यवहारातील करावा प्रयत्न । प्रपंचात न पडू द्यावे न्यून । रोगाची भीति । न ठेवावी चित्ती ॥ रोगाला उपचार करावे जरी बहुत । तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त ॥

आप्त इष्ट सखे सज्जन । यांचे राखावे समाधान । परि न व्हावे त्यांचे अधीन ॥ सर्वांशी राहावे प्रेमाने । चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने ॥ आपलेपणा ठेवला जेथे । प्रेम लागत असे तेथे॥ ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले । तेथे समाधानाचे मान कमी झाले ॥ मन राखता आले । तरच प्रत्येकाला सुख लागले ॥ सुखाने नांदावे नवरा-बायकोंनी । राम आणावा ध्यानी ॥ दोघांनी रहावे प्रेमाने । सदा वागावे आनंदाने ॥ एकमेकांनी दुसऱ्यास दु:ख होईल असे न करावे । काळजी वाटेल असे न वागावे ॥ घरातील माणूस मार्गाने चुकले । त्यास प्रायश्चित्त हवे खरे । पण ते नसावे जन्माचे । तेवढ्यापुरते असावे साचे ॥ एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले । तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे ॥ आचरण शुद्ध असावे । एकपत्नीव्रत सांभाळावे । प्राण गेला तरी परद्वार करू नये ॥ कोणतेही व्यसन करू नये । नीच संगत धरू नये ॥ भलते काम करू नये ॥ गृहछिद्र कोणा सांगू नये । आपला बोज आपण घालवू नये । विश्वासघात कोणाचा करू नये ॥ परदु:खे हसू नये । देहदु:खे त्रासू नये । केला उपकार बोलूं नये ॥ मुलाबाळांस सांभाळून राहावे । प्रपंचात कधी उदास न व्हावे । प्रेमाने वागावे सर्वांशी । सुख राहे नि:स्वार्थापाशी ॥ आईवडिलांची आज्ञा पाळावी । चांगल्याची संगत धरावी । अभ्यासांत लक्ष ठेवून राहावे । भगवंताचे नामस्मरण करावे ॥ नामापरते न माना दुजे साधन । जैसे पतिव्रतेस पति प्रमाण ॥ नामापरते न मानावे सत्य । ज्याने राम होईल अंकित ॥ हेच साधुसंतांचे बोल । कोणीही न मानावे फोल॥

९०. कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांति ॥