२४ फेब्रुवारी

भक्त आणि परमात्मा एकरूपच असतात.

‘आमच्या हातून वारंवार चुका होतात’ असे तुम्ही म्हणता. लहान मुलगा चालताना अडखळतो, पडतो किंवा बोलताना बोबडे बोलतो त्याचे आईबापांना कौतुकच वाटते. त्याचप्रमाणे तुमच्या चुकांचे मला कौतुक वाटते. चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्नांचेही तसेच कौतुक वाटते. म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात आणण्याचे कारण नाही. गुरूने एकदा सांगितले की, ‘तुझे मागचे सर्व गेले, पुढे मात्र वाईट वागू नकोस’ तर शिष्याने ते श्रद्धेने खरे मानावे. आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते. भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषधच आहे. नामाचे हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे. ऑफिसमध्येसुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावे. विद्वान्, अडाणी, श्रीमंत, गरीब सर्वांना हे औषध सारखेच आहे. जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल.

एखादा मुलगा ‘मी विहिरीत उडी घेणार’ म्हणून हट्ट धरून बसला तर बापाने त्याचा हा हट्ट पुरवायचा का त्याला समजावून किंवा तोंडात मारून तिथून बाजूला काढायचे ? त्याप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहेत. खरा भक्त कधीही दु:खी-कष्टी असत नाही, आपल्या समाधानात असतो; मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधिग्रस्त असेना ! अमुक एक हवे ते मिळाले नाही म्हणजे सामान्य माणसाला दु:ख होते. भक्ताला कसलीही आस नसते, त्यामुळे त्याला दु:ख नसते. तो आणि परमात्मा एकरूपच असतात. परमात्म्याची इच्छा हीच त्याची इच्छा असते. सगुणाची भक्ती करता करता त्याला ‘मी’ चा विसर पडत जातो. ‘मी नसून तूच आहेस’ ही भावना दृढ होत जाते. शेवटी ‘मी’ नाहीसा झाला की राम, कृष्ण, वगैरेही नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक उरतो.

आजारामधून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावे, त्याप्रमाणे प्रांपचिकाने सगुणभक्तीने तरून जावे. देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणावाचून भक्तीच करता येणार नाही. भगवंताला आपण सांगावे की, ‘भगवंता, तुझी कृपा मजवर असू दे; आणि कृपा म्हणजे, तुझे स्मरण मला अखंड राहू दे.’ यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल. भगवंतावाचून कशातही समाधान नाही. त्याच्याशिवाय जगण्यात आनंद नाही. जो भगवंताचा झाला, म्हणजे त्याच्या नामात राहिला, त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही.

५५. परमात्म्याला प्रपंचरूप बनविण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावे.