१० फेब्रुवारी

अखंड समाधानाचा मार्ग : नामस्मरण: वृद्धांना उपदेश.

अखंड रामसेवा ज्याला लाभली । धन्य धन्य त्याची माउली ॥ स्वार्थरहित रामसेवा । याहून दुजा लाभ न जीवा ॥ वाचेने भगवंताचे नाव । कायेने भगवंतसेवा । चित्ती भगवंताचे ध्यान । आपण रहावे रामार्पण । याहून अन्य सेवा । कोणतीही नाही जाण ॥ जे जे दिसते ते ते नासते । हा बोध घेऊनि चित्ती । सज्जन लोक जगी वर्तती । तैसे तुम्ही आता वागा जगात ॥ मुलां-बाळांस सांभाळून राहावे । प्रपंचात उदास न व्हावे ॥ प्रपंचाची उपाधि । आता मनात न आणावी ॥ उपाधिवेगळे झाला । ऐेसे ऐकू द्यावे मला ॥ उपाधीत राहिला । परि चित्ताला न वास दिला । ऐसे ठेवा मनी । राम आणावा ध्यानीं । आता यापरतें हित । नाहीं दुसरे जगांत । हा माझा बोल । न मानावा फोल ॥ आता रामा तुझा झालो । कर्तेपणातून मुक्त झालों । ऐसें आणावे मनांत । शक्य तितके राहावे नामात । याहून दुसरें न आणावे मनांत ॥ लौकिकांतील मानापमान । यांचे सोडावें उदक । ध्यानीं आणावा रघुनंदन एक ॥ बायको-मुलांबाळांत राहावे । चित्त रामाकडे ठेवावें । होईल तेवढे नाम घ्यावें ॥ अंतरी परमात्मा त्यास । ठेवून साक्ष भावे भजावे रघुनाथास । न सोडावा मनाचा धीर । मागे आहे रघुवीर ॥

वृद्धपण आलें । शरीर क्षीण झालें । तरी आपण अभिमान घेऊनच राहिले । त्यास सोडावें दूर । प्रपंचांत वृद्धपणीं न पाहावें । मुलांस मार्ग दाखवून सुखी राहावें । औषध पथ्यपाणी सांभाळावें । पण दु:खी कष्टी कधीं न व्हावें ॥ शरीरसंपत्ति क्षीण झाली । तरी वृत्ति क्षीण नाही बनली ॥ जोवर देहाची संगति । तोवर ‘मी-माझें’ ही वृत्ति ॥ आता वृत्ति राखावी रामापाशी । दुजी उठू न द्यावी त्यापरती ॥ आजवर जें घडलें । ते प्रापंचिक, पारमार्थिक असो भले । तें रामकृपेने झाले । हे ठेवावे चित्तीं । आता न सोडावा रघुपति ॥ वयोमानानें शरीर होतें क्षीण । वागणें आहे फार जपून ॥ देह आळशी न ठेवावा हे जरी खरें । तरी त्याची परिस्थिति ओळखून राहणे हे बरे ॥ आता आपण झालो शरीराचे अधीन । हे वयोमानानें दृश्य भासत । तरी भाव ठेवा रामापायीं । ज्याला क्षीणता कधीं आली नाहीं ॥ चित्तीं राखावें समाधान । आनंदानें संसार करावा जाण ॥ समाधानाचें करावे जतन । ते नसावें कशावर अवलंबून ॥ लाभहानींत न गुंतवता मन । राखता येईल समाधान ॥ समाधानाला अडवणूक जाण । माझा मीच आपण ॥ देहाचे भोग ठेवावे देहाचे माथीं । समाधानांत राखावी वृत्ति ॥ सर्व कर्ता राम हा भरवसा ठेवावा ठाम । मग काळजींचे उरलें नाहीं काम । हे सर्व जुळतें म्हणतां राम राम ॥ तरी सर्वांनीं घ्यावे रामनाम । व्हावें परमात्म्याचे आपण । कृपा करील रघुवीर ॥

४१. मागणे तुम्हा एकच पाही । नामावाचून दूर कधीं न राही ॥