३० ऑक्टोबर

ठेवतां रामावर एक विश्वास । त्यालाच समाधान हमखास ॥

रामाचा हात माझ्यामागें हें ठेवावें मनांत । व्यवहार सांभाळून वागावें जगांत ॥ दुष्ट मतीची उत्पत्ति । ही दुर्जनाची संगति ॥ भावें धरितां रघुपति । सर्व संकटें दूर जाती ॥ भोगांत नामाचें न व्हावें विस्मरण । याकरितां राखावें समाधान ॥ देहाचे भोग देहाचे माथीं । त्याची न मानावी खंती ॥ विश्वास ठेवावा रामापायीं । सर्व कांहीं चांगलें होऊन जाई ॥ आपला भार घेतला रामानें । विश्वासानें सत्य मानणें खरें ॥ सद‍्गुरुआज्ञा प्रमाण । हेंच साधनांतील साधन जाण ॥ जो जो प्रसंग येईल जैसा । तो तो सान्निध्य जाणावें रघुपतीचा ॥ शरीर आहे दों दिवसांचें । वायां न जाऊं द्यावें साचें ॥ रामकृपा त्याजसी होई। ज्यानें नांव ठेवलें हृदयीं ॥ मुखीं नाम, हृदयीं राम । त्यानें जोडला आत्माराम ॥ गुरुचरणीं ठेवावा विश्वास। निर्भयता त्यानें येत खास ॥ जें जें होणार तें होतच जातें। विनाकारण मन कष्टी होतें ॥ माझे प्रपंचीं नाहीं सुखदु:ख । असें ज्यानें जाणलें चित्तीं । त्याचा संसार सुखाचा झाला निश्चितीं । ज्यानें दिली रामाची संगति। त्याचा विषाद न मानावा चित्तीं ॥ उद्विग्नतेचें कारण । साधनाचें विस्मरण । मुख्य करितां रामाची भक्ति । आपोआप गळते विषयाची आसक्ति ॥

भगवंतावर ठेवावा पूर्ण विश्वास । तो करतो तेंच हिताचें मानावें खास ॥ अंतकाळीं भगवंताचें नाम। त्याला करीन माझेसमान । हें भगवंताचें वचन जाण । त्याच्यावर ठेवावा विश्वास ॥ म्हणून रामावांचून जगतीं । आतां माझा असें न म्हणावें चित्तीं ॥ दु:ख जाण्यास उपाय सांगती साधुजन। आसक्तीत न गुंतावें आपण ॥ म्हणून, सर्व कांहीं करावें । पण मीपणानें कोठें न राहावें ॥ याला उपाय एकच जाण । सदा राखावें रामाचें अनुसंधान । कशांतहि नसावें आपलेपण ॥ परिस्थिति निर्माण झाली । कालांतरानें विलय पावली ॥ म्हणून न मानावें कशाचें सुखदु:ख । सर्वांत रामाची जाणीव एक ॥ वाचेनें मौन, हृदयांत रामाचें प्रेम । अखंड रामाचें अनुसंधान । याहून दुजें नाहीं साधन । हें मानावें प्रमाण ॥ ठेवतां रामावर एक विश्वास। त्यालाच समाधान हमखास । म्हणून रामाचा चित्तीं ठेवावा विश्वास । वळण द्यावें व्यवहारास ॥ साधन असें कांहीं असावें । ज्यानें साध्याला सहज पोहोचावें ॥ राम म्हणावा आपला । साधनांतील साधनाचा लाभ झाला ॥ शुद्ध असावें आचरण । पवित्र करावें मन ॥ नामस्मरण ज्याच्या मुखीं । रामकृपें तोच एक सुखी ॥ एकच देव, एकच गुरु, एकच साधन । यांवर ठेवतां विश्वास । कृपा करील ईश्वर खास॥

३०४ जेव्हां मनासकट देह केला अर्पण । मग मरणाच्या भयाचे काय कारण ॥