२० ऑक्टोबर

भगवंताला होता अर्पण । तेथें सुख दुःखाचे नाही कारण ॥

सर्वस्वीं व्हावें रामास अर्पण । हाच उपाय सांगती साधुजन ॥ रामास अर्पण व्हावें कोण्या रीती। त्याचा मार्ग सज्जन सांगती ॥ प्रथम राखावें भगवंताचें अधिष्ठान । तेथें प्रयत्नांचा उगम ॥ अखंड राखावें अनुसंधान । येणें कर्म होईल सहज रामार्पण ॥ उपास्यदेवतेची करावी आठवण । मनानें जावें त्यास शरण ॥ सद्‌गुरूसी झाला जो अनन्य । त्यास दुजें करणें नाहीं अन्य ॥ सद्वृत्ति, सद्गुण, दुर्गुणादि विकार । हें सर्व करावें रामार्पण । त्यानेंच रामाचें होऊन राहणें जाण ॥ राजापोटीं पुत्र जन्मा आला । राजपद हातीं चालत आलें त्याला । तैसें आपण व्हावें रामार्पण । विषयाचा न लागे तेथें लाग जाण ॥ मनानें भगवंतास जावें शरण । व्यवहारांत दक्षता ठेवावी आपण ॥ अनन्य व्हावें रामास शरण । तुझेविण नाहीं मानणें कांहीं अन्य ॥ ठेवावा सदा मनीं ध्यास । दया येईल रामरायास॥ जेव्हां मनासकट देह केला अर्पण । मग मरणाच्या भयाचें काय कारण ? ॥

परमार्थाचें मुख्य साधन । शक्यतों न चुकूं द्यावें अनुसंधान । मुखीं करावें नामस्मरण । हृदयीं भगवंताचें ध्यान । याविण नाहीं दुजा उपाय जाण ॥ सर्व कांहीं करीत जावें । परि व्यवहारीं न गुंतावें॥ ऐसें राहावें प्रपंचांत । जसा पाहुणा वागे जगांत ॥ बाह्य सृष्टि विषयाकार । तेथें मन न गुंतूं द्यावें जाण ॥ देह लावावा प्रपंचीं । मन लावावें रामचरणीं ॥ लोभ्याचें चित्त पैशावरी । परि व्यवहार जैसा करी । तैसें मन ठेवावें रामावरी । प्रपंचांत असावी हुशारी । चित्त एकाग्र न व्हायला कारण । विषय मानला आपला जाण । घार फिरते आकाशांत । तैसें चित्त राहातें विषयांत । म्हणून दृष्टि ठेवावी त्याचेवर । जें स्वाभाविक आहे स्थिर ॥ एकाग्रतेस करणें साधन । त्याला करणें जरूर नामस्मरण ॥ एकाग्रतेस उपाय एकच खरा । नामीं प्रेमा ठेवा पुरा ॥ निश्चितपणा राखावा । साधनांत जोर आणावा ॥ विषयापासून निवृत्ति । जडावी नामाची प्रीति । त्याला दूर नाहीं रघुपति ॥ व्यवहारांत असावी दक्षता । परि राम चिंतीत जावा सदा ॥ प्रपंचांत असावे लक्ष। तरी त्याचा चित्तीं घेऊं नये पक्ष ॥ परमात्म्याने जें जें दिले । तें तें त्याचें म्हणून सांभाळणें भलें । मुला-बाळांचें करावें जतन । रामानें दिलेलें हें जाणून । त्यांच्या लोभांत न गुंतवावें चित्त । हाच परमार्थ सत्य ॥ सर्व कांहीं करावें । मीपणानें न राहावें । रामसेवा रामासाठीं । न जाणावी विषयासाठीं ॥ प्रपंच न मानावा सुखाचा ॥ तो असावा कर्तव्याचा ॥ सदा राहावें सावधचित्त । मनानें भजावा भगवंत ॥

२९४. जें जें कांही माझे । तें तें जाणावें रामाचें । राम त्यास सांभाळिता । काळजीस कारण उरले नाही आतां ॥