२0 ऑगस्ट

दास विषयाचा झाला । सुखसमाधानाला आंचवला ॥

सर्व दु:खाचें मूळ देह हाच होय ॥ त्यांतच देहाला दुखणें । म्हणजे दु:खाचा कळस होय ॥ मिठाचें खारटपण । साखरेचें पांढरेपण । यांस नसे वेगळेपण । तैसें देह आणि दु:ख जाण ॥ देहानें जरी सुदृढ झाला । तेथेंहि दु:खाचा विसर नाहीं पडला ॥ सांवली जशी शरीराला । तसा रोग आहे शरीराला ॥ रामकृष्णादिक अवतार झाले । परी देहानें नाहीं उरले ॥ स्वत:चा नाहीं भरंवसा हें अनुभवास येई । परि वियोगाचें दु:ख अनिवार होई ॥ देहदु:ख फार अनिवार । चित्त होई नित्य अस्थिर ॥ देहाचे भोग देहाचेच माथीं । ते कोणास देतां येत नाहींत । कोणाकडून घेतां येत नाहींत ॥

आजवर जें जें कांहीं आपण केलें । तें तें प्रपंचाला अर्पण केलें । स्वार्थाला सोडून नाहीं राहिलें ॥ अधिकार, संतति, संपत्ति, । लौकिकव्यवहार, जनप्रीति, । या सर्वांचें मूळ नाहीं स्वार्थापरतें । अखेर दु:खालाच कारण होतें ॥ जो जो प्रयत्न केला आपण । तेंच सुखाचें निधान समजून । कल्पनेनें सुख मानलें। हातीं आलें असें नाहीं झालें ॥ ज्याचें करावे बहुत भारी । थोडें चुकतां उलट गुरगुरी । ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन । हें ओळखून वागावें आपण ॥ प्रपंचांत आसक्ती ठेवणें । म्हणजे जणूं अग्नीला कवटाळणें । म्हणून आजवर खटाटोप बहुत केला । परि कामाला नाहीं आला ॥ विषयांतून शोधून काढलें कांहीं । दु:खाशिवाय दुसरें निघणारच नाहीं ॥ म्हणून प्रपंचानें सुखी झाला । ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला ॥ ज्याची धरावी आस । त्याचें बनावें लागे दास ॥ दास विषयाचा झाला । तो सुखसमाधानाला आंचवला ॥ ज्या रोपट्यास घालावें खतपाणी । त्याचेंच फळ आपण घेई ॥ विषयास घातलें खत जाण । तरी कैसें पावावें समाधान ? ॥ प्रपंचांतील संकटें अनिवार । कारण प्रपंच दु:खरूप जाण ॥ आजवर नाहीं सुखी कोणी झाले । ज्यांनीं विषयीं चित्त गुंतविलें ॥ कडू कारलें किती साखरेंत घोळलें । तरी नाहीं गोड झालें । तैसें विषयांत सुख मानलें । दु:ख मात्र अनुभवास आलें ॥ प्रपंचांतील उपाधि । देत असे सुखदु:खाची प्राप्ति ॥ संतति, संपत्ति, वैभवाची प्राप्ति, । जगांतील मानसन्मानाची गति, । आधुनिक विद्येची संगति, । न येईल समाधानाप्रति । प्रपंचांतील सुखदु:खाची जोडी । आपणाला कधीं न सोडी ॥ नामांतच जो राहिला । नामापरता आठव नाहीं ज्याला । परमात्मा तारतो त्याला । हाच पुराणींचा दाखला ॥

२३३. नका करू आटाआटी । राम ठेवावा कंठी ॥