१३ ऑगस्ट

देहाचे भोग आणि आनंद.

तुम्हाला आपल्या हिताकरिता दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरुर आहे. तुम्ही असे नाही म्हणता कामा की, परमात्म्यानेच याला अशा स्थितीत ठेवला आहे, त्याच्या विरुद्ध कसे जावे ? तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही, पण आपल्या हिताकरिता, म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी, दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे. जसे लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला पोहोचतो, तद्वत् लोकांच्या उपयोगी पडले म्हणजे ते परमात्म्याला पोहोचते.

परमात्म्याने पाठविलेली दुखणी, संकटे यात आनंद मानला पाहिजे. एखाद्या आजारी माणसाची देहकष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर तुम्हाला सांगितली, तर ते काम तुम्ही आनंदाने कराल. सद्‌गुरूंनी आपल्याला हे काम सांगितले याचा आनंदच वाटेल. मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी, संकटे, यांचाही तुम्ही का नाही मानू आनंद ? पण परमात्मा आपला सर्वस्वी हितकर्ता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठे ? परमात्म्यानेच धाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावीत ? दुसरे असे की, भोग हा भोगलाच पाहिजे. आता जर भोगला नाही, तर पुढे तरी भोगावा लागणारच ना ?

देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असे तुम्ही म्हणता; पण तुम्हाला देहाचा खरा विसर कधीही पडत नाही. त्याची आठवण सामान्यपणे असतेच. दुखणे वगैरे आले म्हणजे ती विशेषपणाने भासते इतकेच. दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे, दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल; म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे, आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे.

अनुसंधान कशाला म्हणावे ? उठणे, बसणे, जप करणे, वाचन करणे, गप्पागोष्टी करणे, चेष्टा-विनोद करणे, वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा, हेच अनुसंधान. भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. ‘ मी अनुसंधान टिकवीन ’ असा मनाचा निश्चय करावा. जगाच्या प्रवाहात उलट पोहणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकविणेच होय. भगवंताचे होऊन प्रपंच करणे ही सर्वश्रेष्ठ कला आहे. भक्ताला ही कला अवगत झाल्याने भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंदच दिसतो.

२२६. देहाची सुखदुःखे प्रारब्धावर टाकू या आणि नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करू या.