३० जुलै

राम कर्ता हे जाणून चित्तीं । जगांत संत ऐसें वर्तती ॥

जेथें मीपणाचें ठाणें । तेथें दु:खाचें साम्राज्य असणें । हा आहे नियम । म्हणून मी सांगतों राखावा नेम ॥ सर्वस्वीं व्हावें भगवंताचें। ‘ मी, माझें ’ सोडून साचें ॥ बाह्य मीपणानें जरी सोडलें । पण अभिमानानें वृत्ति बळावली । तेथें घाताला सुरुवात झाली ॥ बुद्धि करावी स्थिर । नामीं असावें प्रेम अनावर । राम कर्ता हें जाणून चित्तीं । जगांत संत ऐसें वर्तती ॥ साधनीं सावधान जाण । हेंच साधकाचें मुख्य लक्षण॥ बाह्य वेषानें कसाहि नटला । जगाला भुलविता झाला । तरी जोंवरी नाहीं चित्त स्थिर । कसा पावेल रघुवीर?॥ आजवर केल्या गोष्टी फार । भल्या बुऱ्या असतील जाण । त्याचा न करावा विचार । पुढें असावें खबरदार ॥ मानावी परस्त्री मातेसमान । दुसऱ्याचें न पाहावें उणेंपण । परनिंदा टाळावी । स्वत:कडे दृष्टि वळवावी ॥ गुणांचें करावें संवर्धन । दोषांचें करावें उच्चाटन । याला एकच उपाय जाण । अखंड असावें अनुसंधान ॥

प्रपंच न मानावा सुखाचा । तो असावा कर्तव्याचा ॥ वृत्ति असावी स्थिर । चित्तीं भजावा रघुवीर ॥ असा करा कांहीं नेम । जेणें जवळ येईल राम ॥ प्रपंचाची धरितां कांस । दु:खचि पावे खास ॥ प्रपंच हाच आधार । प्रपंचाविण निराधार । ऐशी होई ज्याची वृत्ति । समाधान न ये त्याचे हातीं । तुम्ही सुज्ञ भाविक जाण। एवढें ऐकावें माझें वचन ॥ दुष्ट मतीची उत्पत्ति । ही दुर्जनाची संगति । भावें धरितां रघुपति । सर्व संकटें दूर जाती ॥ वृत्ति असावी खंबीर । ज्याचा आधार रघुवीर ॥ दुर्जनांचें जैसें मन । पाषाणास न फुटे द्रव जाण । तैसें प्रपंचीं इच्छी जो सुख । जें आजवर कोणास न मिळाले देख ॥ प्रपंचाचें दु:ख जाण । तें मीपण असल्याची खूण जाण ॥ जगांत वर्तावें, घरांत असावें । व्यवहारांत व प्रपंचांत वागावें । परि न कोठें गुंतावें ॥ फार दिवसांचा वृक्ष झाला । घरांतील घडामोडी दिसती त्याला । जैसें तो न सोडी आपलें स्थान । तैसें वागावे आतां आपण ॥ ज्याचे घरीं रामाचा वास । तेणें न राहावें कधीं उदास ॥ सदा राखावें समाधान । मुखीं भगवंताचें नाम ॥ आतां प्रेम ठेवा नामीं । कृपा करील चक्रपाणी ॥ आतां करा चित्त स्थिर । हृदयीं धरा रघुवीर ॥ रामावांचून न आणावा विचार । हाच माझा आशीर्वाद ॥

२१२. जेथे नाम तेथे राम । हा ठेवावा विश्वास । कृपा करील रघुनाथ खास ॥