१९ जुलै

साधनाची चार अंगे.

मी जेव्हा भजन करीत असे, त्या वेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे. तसेच तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे, आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी सांगतो आहे. प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावे आणि ते घालविण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येकजण स्वत:च्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून, दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दोषांकडे पाहतो. त्याला स्वत:च्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ मुसळापेक्षा जास्त मोठे दिसते, हेच चुकते. आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत, आणि परनिंदा करू नये. रोज निजण्याच्या वेळेस, आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल. रोज असे तुम्ही करीत जा, म्हणजे तीन महिन्यांत तुमचे चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत ? आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का ? संत आपल्यासारखेच देहधारी असतात का ? हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणे कठीण आहे. अशा वेळी दासबोध हाच सत्संग होईल. समर्थांनी सांगून ठेवले आहे की, जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील त्याला माझा संग घडेल.

आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात, तेच ते होत, असे समजावे. त्यांनी चार गोष्टी करायला सांगितल्या आहेत : एक, निर्गुणत्व कळायला कठीण, म्हणून सगुणोपासना करावी. त्यानेच निर्गुणरहस्य कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता. अभिमानाने परमात्मा दुरावतो. सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. तिसरी गोष्ट अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावे. त्याचे महत्त्व फार आहे. चौथी गोष्ट म्हणजे भगवन्नामस्मरण अखंड ठेवणे. परमात्मप्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. संत भेटल्यावर, काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच कामा नये. ज्यांना ते वाटते, त्यांना गुरू भेटूनही भेट न झाल्यासारखेच आहे. आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली, अशी इच्छा का असावी ? गुरू एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते, त्यानेच गुरू भेटल्याचे सार्थक केले असे होते. गुरुआज्ञेपरते दुसरे त्याला साधनच नसते. तोच परमार्थ, आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखी काही करायचे आहे असे त्याच्या ध्यानीमनीही येत नाही.

२०१. अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा, आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावे.