२० जून

ज्याला प्रपंच नाही करता आला । त्याचा परमार्थ ढिला पडला ॥

मातापिता यांचे न पाहावे दोष । हे सत्पुत्राचे लक्षण सत्य ॥ माता-पितरांचे समाधान । हेच सुपुत्राचे खरे लक्षण जाण ॥ त्यांचे राखून समाधान । जे करणे असेल ते करावे जाण ॥ आईचे अंत:करण अत्यंत कोवळे असते । आपले दु:खीपणाने ते दु:खी होते । आपली आनंदी वृत्ति आईला आनंदी बनविते । म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात । काहूर न माजू द्यावे चित्तात ॥ शब्दाने करावे त्यांचे समाधान । उत्तरी अपशब्दाचे न मानावे दु:ख जाण ॥ नोकरी चाकरी उद्योग धंदा । पोटाकरिता करणे आहे सदा ॥ आपण पैका मिळवावा पुष्कळ । पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ ॥ प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये । तसे शब्द बोलू नये ॥ आल्या अतिथा अन्न द्यावे । कोणास विन्मुख न पाठवावे ॥ निरुत्साही बनू नये । निराश वाटू देऊ नये ॥ अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे । त्यात रामाचे अधिष्ठान राखावे॥ ज्याला प्रपंच नाही करता आला । त्याचा परमार्थ ढिला पडला ॥

प्रपंचाची काळजी । हीच परमार्थाला वाळवी ॥ परमात्म्याचा आधार ज्याला । ठाव नसे काळजीला ॥ शेजार असता रामाचा । दु:खाची, काळजीची, काय वार्ता ? ॥ मी कोण हे जाणले ज्याने चित्ती । त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ति ॥ राम त्राता हा भाव ठेवावा चित्ती । निर्भयता होईल याच रीती ॥ ज्याने देह केला रामाला अर्पण । त्याला नाही काळजीचे कारण ॥ कर्ता राम हे आणता चित्ती । पापपुण्याची नाही त्याला भीति ॥ ज्याचा परमात्मा झाला सखा । त्याला नाही कोठे धोका ॥ ‘ कर्ता मी ’ म्हणे आपण । हे सर्व दु:ख-काळजीचे कारण ॥ झाले ते होऊन गेले । होणार ते चुकेना कोणाला भले ॥ म्हणून नाही करू काळजीला । राम साक्षी आहे त्याला ॥ जे जे काही माझे । ते ते जाणावे रामाचे ॥ राम त्यास सांभाळता । काळजीस कारण न उरले आता ॥ मुलाबाळांची न करावी काळजी । रामराय करावा राजी ॥ आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्तीं । काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीति ॥ शक्य तो करावे नामस्मरण । आपली काळजी न करावी आपण ॥ रामाचा म्हणून प्रपंच केला । काळजीचे कारण उरत नाही आपल्याला ॥ भगवंत असता पाठीराखा । काळजीची काय कथा ? ॥ म्हणून, मुखाने नाम, चित्तांत राम, । त्याचे मनाला होईल आराम ॥ सतत ठेवावे एक चित्तीं । न सोडावा रघुपति ॥ सर्व सारांचे सार । एक भजावा रघुवीर ॥ नेमात नेम उत्तम जाण । रामावाचून न राहावे आपण ॥

१७२. सर्व कर्ता राम । हा भरवसा ठेवावा ठाम । मग काळजीचे उरले नाही काम ॥