१९ जून

'मी कोणीतरी आहे' ही वृत्ती घातक.

पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला, की जगातल्या सर्व दु:खांचे मूळ, देहदु:ख आणि पैशाची टंचाई ह्यांत मुख्यत: साठविलेले आहे. या दोन्ही गोष्टींत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले, आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला. पैशाचा विचार करता असे दिसले की, आपण लंगोटी घातलेली, जवळ पैसा नाही, आणि त्याचा लोभही नाही. आता दुसऱ्याला पैसा द्यायचा म्हटले, म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केला पाहिजे, तरच तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल; नंतर पैसे मिळविणे, आणि त्याच्यानंतर तो गरजवंताला देणे. पण हे करणे वाटते तितके सोपे नाही. कारण दुसऱ्याला देण्याकरिता पैसा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला, तोच पैसा सोडताना आपल्या आड येईल, आणि दुसऱ्याला पैसा देण्याची बुद्धी मारील. म्हणजे परिणाम असा होणार की, दुसऱ्याला पैसा तर देता आला नाहीच, पण आपल्या ठिकाणी मात्र आधी नसलेला पैशाचा लोभ उत्पन्न झाला. ह्यात दुसऱ्याचे काम तर नाहीच, आणि स्वत:चे मात्र नुकसान झाले. दुसरी बाब देहदु:खाची. ज्याची देहबुद्धी मेलेली आहे, त्याला दुसऱ्याच्या देहदु:खाची जाणीव होऊ शकत नाही. म्हणजे, दुसऱ्याचे देहदु:ख नाहीसे करावे अशी बुद्धी होण्याकरिता स्वत:च्या ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागेल. समजा, इतके केले, आणि दुसऱ्याचे देहदु:ख निवारले, तरी त्याला पुन: देहदु:ख भोगावे लागणारच नाही असे कसे होईल ? आज झालेली पोटदुखी बंद केली तरी कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजार येणारच नाही असे कसे होऊ शकेल ? म्हणजे देहदु:ख कायमचे टाळता येत नाही, आणि पैसाही देता येत नाही. अशाने जगाला सुखी तर करता येत नाहीच, पण आपल्या स्वत:च्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळे स्वत:ची अवनती केल्यासारखे होऊन, नुकसान मात्र पदरात पडते. म्हणून रामाची प्रार्थना केली की, असल्या गोष्टी करण्याची शक्ती आणि बुद्धी मला देऊ नकोस.

बालपणाची सरल वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत. एक पैसा, आणि दुसरे विद्या. दोन्हींपासून ‘ मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ’ ही वृत्ती उत्पन्न होते, आणि ती घातक असते. ‘ मी कुणीतरी आहे ’ असे वाटण्यापेक्षा ‘ मी कुणाचा तरी आहे ’ असे वाटणे हिताचे आहे. जगातले अत्याचार, अनीती, अधर्म, असमाधान या सर्वांचे कारण हेच की, मनुष्य जास्त लोभी झाला आहे. देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पहायची त्याला भगवंत जास्त पैसे देतो.

१७१. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून, असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय.