१० जून

आपला व्यवहार, परमार्थ, घडतो । तो सर्व त्याचे इच्छेने चालतो ॥

 ‘ असे झाले असते तर बरे झाले असते ’ । हे म्हणणे नाही खरे ॥ जे होणे योग्य ते घडले । व ते रामइच्छेनेच घडले ॥ परमात्म्यानेच जी इच्छा केली । त्याचे आड नाही कोणी आले । हा ठेविता विश्वास । मनाला धीर वाटेल खास ॥ माझे सर्व कर्माचा गुरूच सूत्रधार । सर्व सत्ता गुरूचे हाती । तेथे न चाले कोणाची गति ॥ आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती । तेथे बाकीच्या गोष्टींची काय मिति ? ॥ परिस्थिति कोणाचीही । कितीही असली भली किंवा बुरी । तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी ॥ न पडावे अभिमानाला बळी । रामइच्छा जाणावी सगळी ॥ हा जरी असेल सिद्धांत । तरी जपून वागावे व्यवहारात ॥ आपला व्यवहार, परमार्थ घडतो । तो सर्व त्याचे इच्छेेने चालतो ॥ म्हणून होणे जाणे भगवंताच्या हाती । आपण त्याला जावे शरणागति ॥ चित्तांत ज्याच्या राहिले समाधान । तोच भगवंताचा आवडता जाण ॥ ज्याचा विश्वास रामावरी। त्याला समाधान स्वीकारी ॥ माझे हित रामाचे हाती । हा धरिता विश्वास । समाधान मिळत असे जीवास ॥ आपण होऊन रामाचे जाण । सदा राखावे समाधान ॥ मी-माझे करावे रामार्पण । तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण ॥ आस ठेवावी रामापायी । आनंदी समाधानी राही ॥ अंतरी समाधान । हेच आपले साधन जाण ॥ संसारात न पहावे उणे पुरे । ठेवावे त्यात समाधान खरे ॥ जशी जशी ज्या वेळी जी परिस्थिति । तशी तशी असावी समाधान वृत्ति ॥ ज्या स्थितीत ठेवील राम । त्यात राखावे समाधान ॥ चिंता, अहंता, ममता, कोणी कारणावाचून । केले छळ, कपट, अपमान । अथवा बोलिले शब्दबाण । त्यात राखावे समाधान ॥ समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती । ईश्वरकृपेनेच त्याची प्राप्ति ॥ जोवर संशयी झाले मन । तोवर न होई समाधान ॥ विषयास घातले खत जाण । तरी कसे पावावे समाधान ? ॥ जोवर दृश्याचे भान । तोवर मनी न राहे समाधान ॥ समाधानाची स्थिति । उपाधिरहित असावी वृत्ति ॥ कोठे ठेवावे मन । जेणे मिळेल समाधान ? ॥ समाधान नव्हे देहाचा गुण । मनाने व्हावे भगवंताचे आपण ॥ पांडव झाले वनवासी । पण अखंड राहिले भगवंतापाशी ॥ पांडव भगवंताचे भक्त झाले । वनवास नाही चुकविता आले । त्यांनी केले भगवंताचे स्मरण। जेणे राखिले समाधान ॥ ‘ आता झालो मी रामाचा ’ । हा विचार ठेवावा साचा ॥ ऐसे होऊन राही । समाधान तेथेच पाही ॥

१६२. सर्व कर्ता राम । हे ठेविता चित्ती । समाधान येते त्यापरती ॥