२० मे
भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा.
दु:खाचे मूळ कारण । स्मरणांतून गेला रघुनंदन ॥ सर्व दु:खांचे मूळ । भगवंतापासून झालो दूर ॥ रामावाचून प्रपंचात नाही सुख। कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दु:ख ॥ कोळशाने हात काळा झाला। त्याने दु:खी कष्टी झाला । ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला । आपण मात्र नाही ओळखला । तैसा प्रपंच दु:खाचा झाला । भगवंतावाचून वाया गेला ॥ जगातील ऐश्वर्य, मानाची प्राप्ति । रामरायाविण समाधानाला न देती ॥ जे जे वैभव जगती । ते ते आले हाती । वाया सर्व जाते । हाती न येता रघुपति ॥ परमात्म्याचे विस्मरण । हेच बीज जाणावे मूळ कारण ॥ काळजी, चिंता, अहंकार, । भीति, तळमळ फार, । हा झाला त्याचाच विस्तार -॥ तात्पर्य, कडू बी पेरले । त्याचे गोड फळ नाही आले ॥ काळजी आणि भीति । भगवंताच्या विस्मृतीत जन्मती ॥ म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानि । परमात्म्याला दूरच करतील दोन्ही ॥ व्यवहार, सद्वासना, सदाचरण । लौकिक, संतति, संपत्ति, शास्त्राचे मनन, । सर्व काही रामाविण वाटे शून्य ॥ संतति, संपत्ति, लौकिकाची प्राप्ति । सर्व वैभव जरी आले हाती । तरी रामाविण आहे फजिती ॥ प्रपंची ठेवता दक्षता । न विसंबे रघुनाथा । तोच प्रपंची सुखी जाणा ॥ प्रपंच करावा सर्वांनी जपून । पण रामाचे स्मरण राखून ॥
सर्वस्वी व्हावे भगवंताचे । मी-माझे सोडोनि साचे ॥ भगवंताचे होऊन राहणे । याहून दुजे काही न करणे ॥ ‘ मी कर्ता नव्हे ’ जाणून करी कर्म । त्याला बाधेना कलीचा मार्ग ॥ दुष्ट अभिमानाला न पडावे बळी। त्याचा मालक होईल कलि ॥ कलि जेथे शिरला । त्याने राम दूर केला ॥ भगवंताचे स्मरण सांभाळून । कोणताही करावा व्यवसाय जपून । हेच प्रापंचिकास मुख्य साधन ॥ कर्ता मी नव्हे, कर्ता राम, । ही मनात जाणून खूण । करावा व्यवहार जतन ॥ रामापरते हित । मानी त्याचा होई घात । जोवर ‘ कर्ता मी ’ हे ध्यानी। तोवर मन न लागले राघवचरणी ॥ मीपणा टाकावा, अभिमान सोडावा । सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बाळगावा ॥ ज्याने केले सर्वच रामास अर्पण । तेथे मीपणास नाही ठाव ठिकाण ॥ पापाचे न व्हावे आपण धनी । कर्ता राम जाणून मनी ॥ रामसेवेपरते हित । सत्य सत्य नाही या जगात ॥ म्हणून रामास व्हावे अनन्य शरण । दु:ख दूर व्हावयास मुख्य साधन ॥ मनाने होऊन जावे भगवंताचे । त्याने खास केले सार्थक जन्माचे ॥ म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा । ज्याने जोडला रामराणा ॥ ज्याने देह केला रामास अर्पण। धन्य धन्य त्याचे जीवन ॥